सिरसंगी प्रतिनिधी
वाटंगीच्या देसाई कुटुंबियाकडून पारंपरिक रक्षाविसर्जनला फाटा देत पर्यावरण दिनाचे औचित्य साधून शेतात वृक्षारोपण करून समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे . वाटंगी येथील श्री रवळनाथ दूध संस्थेचे सचिव अजित नानासो देसाई यांच्या मातोश्री व रवळनाथ उद्योग समूहाचे प्रमुख विजय बाबुराव देसाई यांच्या काकी श्रीमती नर्मदा नानासो देसाई यांचे वयाच्या 103 वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले , तिसऱ्या दिवसाच्या कार्यानिमित्त पारंपरिक रक्षाविसर्जन नदीमध्ये न करता देसाई कुटुंबियानी राख शेतामध्ये पसरून त्याठिकाणी आंब्याची झाडांची लागवड केली. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला. देसाई कुटुंबीयांनी आईच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करत लावलेले हे वृक्ष तिच्या प्रेम, संस्कार आणि जीवनमूल्यांचे जिवंत स्मारक ठरतील. तिच्या स्मृती चिरंतन राहाव्यात आणि निसर्गाचे संवर्धन व्हावे, हीच या उपक्रमामागील भावना असल्याचे मत अजित देसाई व विजयराव देसाई यांनी सांगितले . उत्तरकार्यादिवशी झाडे वाटप करणार असल्याचे देसाई कुटुंबियाकडून सांगण्यात आले .














