सिरसंगी प्रतिनिधी
गेल्या चार दिवसापासून वनविभागाने सिरसंगीत गणेश हत्ती हुसकावून लावण्यासाठी मोहीम राबवली होती. त्यासाठी गेले चार दिवसात हत्तीला किणे, चाळोबावाडी अर्जुनवाडी, तळेवाडीपर्यंत पिटाळण्यात यश आले होते. . हत्ती अडकूर राजगोळी मार्गे कर्नाटकात जाईल असा अंदाज वनविभागाने व्यक्त केला होता. पण वन विभागाचा अंदाज फोल ठरवत हत्ती पुन्हा सिरसंगीच्या जंगलात दाखल झाला आहे.
यामुळे शिरसंगी येमेकोंड नागरिकांच्या मनात पुन्हा भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या पंधरा-वीस दिवसांपूर्वी हत्तीने उग्ररूप धारण करून शिरसंगी गावात प्रवेश करून दुचाकी चार चाकी वाहनांची मोडतोड केली होती त्याचबरोबर नदीकाठच्या पाण्याच्या मोटर, शेत शिवारातील पत्र्यांचे शेड काजूची झाडे यांची नासधूस केली होती. शिरसंगी चे माजी सरपंच सुभाषराव देसाई यांनी माननीय हसन मुश्रीफ साहेब यांच्याकडे हत्तीचा बंदोबस्त संदर्भात निवेदन दिले होते. त्या अनुषंगाने मा.हसन मुश्रीफांनी कोल्हापूर वनविभाग चे अधिकाऱ्यांना फोनद्वारे संपर्क साधून हत्ती हटाव मोहिमेसंदर्भात चर्चा केली होती. त्यानंतर हत्तीला हुसकावून लावण्यासाठी वन विभागाने गेले चार दिवस दिवस रात्र अथक प्रयत्न केले होते. पण हत्तीने वन विभागाचे प्रयत्न हाणून पाडले.
सोमवारी रात्री हत्तीने सिरसंगी हद्दीत प्रवेश करून शेत शिवारातील प्रकाश देशपांडे यांच्या शेतातील पाईपलाईनच्या टी व पाण्याचे प्लास्टिक ड्रम ची मोडतोड करून नुकसान केले आहे.
वन विभागाने त्वरित हत्ती हटाव मोहीम राबवावी अशी मागणी शेतकरी व नागरिकांनी केली आहे.














