सिरसंगी प्रतिनिधी
चंदगड ते कोल्हापूर दरम्यान निघालेल्या शिक्षण हक्क यात्रेला आजरा येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वाडी–वस्तीवरील शाळा टिकवणे आणि प्रत्येक वर्गासाठी स्वतंत्र शिक्षक देणे या प्रमुख मागण्यांसाठी ही यात्रा काढण्यात आली असून शिवतीर्थ ते तहसीलदार कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला.
राज्य शासनाच्या कमी पटसंख्येच्या कारणावरून शाळा बंद करण्याच्या धोरणाच्या पार्श्वभूमीवर “शाळा बचाव” अभियान सुरू करण्यात आले आहे. शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी राज्यातील ३५५ शाळा बंद असल्याची माहिती दिली असून भविष्यात आणखी शाळा बंद होण्याची भीती व्यक्त होत आहे.
कॉ. संपत देसाई यांनी “वस्ती तेथे शाळा, प्रत्येक वर्गाला स्वतंत्र शिक्षक” ही आंदोलनाची ठाम भूमिका स्पष्ट केली. जिल्हा परिषद सदस्य सुधीर देसाई यांनी शाळा टिकवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. यावेळी विविध राजकीय व सामाजिक नेत्यांनी मनोगत व्यक्त करत आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आणि अनेक कार्यकर्त्यांनी यात्रेत सक्रिय सहभाग नोंदवला. यामध्ये उबाठा गटाचे नेते विजय देवणे जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे ,कॉ. संजय तर्डेकर ,काशिनाथ मोरे दौलतराव पाटील, आजरा कारखान्याचे संचालक शिवाजीराव नांदवडेकर , अनिल फडके यांच्यासह तालुक्यातील विविध गावातील लोकप्रतिनिधी सहभागी झाले होते.

माजी सभापति अल्बर्ट डिसोझा यांचा सहभाग
आजरा तालुक्याचे माजी सभापती अल्बर्ट डिसोजा मोर्चाला हजर राहिले. शरीराने थकलेले असल्याने त्यांनी मोर्चातील लोकांच्या सोबत बसून आंदोलनामध्ये आपला सहभाग घेतला. पाच वर्ष सभापती असताना डिसोझा यांनी प्राथमिक शिक्षकांच्या बद्दल खूप चांगली काम केलेली आहेत. त्यांच्या सहभागाने आंदोलकना बळ मिळाले.













