
महादेव कुडव सिरसंगी
नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदमधून राष्ट्रवादीचे सुधीर देसाई यांनी बाजी मारून आजरा तालुक्यावरील आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. तर वाटंगी पंचायत समिति मतदारसंघातून भाजपने समीर पारधे यांच्या विजयातून आपले वर्चस्व कायम राखले आहे. सुधीर देसाई यांना 12042 मते तर भाजपचे जयवंत सूतार यानी 10613 व शिवसेनेचे विष्णुपंत केसरकर यानी 6340 मते घेतली आहेत वाटंगी पंचायत समितीमधून भाजपचे समीर दशरथ पारदे यांनी 6226 तर सतीश गणपती फडके शिवसेना शिंदे गट यानी 2572 राजाराम गुणाजी होलम राष्ट्रवादी अजित पवार गट यानी 5263 मते घेतली आहेत. महायुती मध्येच जुंपलेल्या रणधूमाळीत आखेर राष्ट्रवादी पक्षाने पेरणोली जि प. मतदारसंघातील आपले वर्चस्व सिद्ध केले .
गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजपप्रणित तारारानी आघाडीच्या सुनीता रेडेकर या कोळींद्रे मतदारसंघातून निवडून आल्या होत्या. यावेळी मतदारसंघातील नवीनच झालेल्या पुनर्रचनेमुळे उमेदवार निवडीपासूनच प्रत्येक पक्षासमोर आव्हान होते. महायुतीतील असणाऱ्या तिन्ही आमदारांच्या आपल्या वर्चस्ववादामुळे आपापले उमेदवार रिंगणात उतरवले तसेच महाविकास आघाडीतील नेत्यानी लढाईआधीच तलवार म्यान करत सोयीनुसार महायुतीतील पक्षाशी युती करत पाठिंबा दिला . तिन्ही आमदारांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली होती. सुरुवातीपासूनच भाजपमध्ये उमेदवारीवरून चढाओढ पाहायला मिळाली. त्यातच अशोक च रा टी यांच्या गटामधील पडलेली फुट त्याचबरोबर भाजपमधील तालुकास्तरीय नेत्यांच्या नाराजीचा फटका जयवंत सुतार यांना पेरणोली मतदारसंघात कमी मताधिक्य मिळण्यास कारणीभूत ठरला .
माजी सभापति विष्णुपंत केसरकर यांचे बाबतीत आमदार प्रकाश आबिटकर यांची जादू चालली नसल्याचे पाहायला मिळाले. गत निवडणुकीपेक्षाही केसरकर हे मताधिक्यानी खूप पिछाडीवर राहीले . या उलट राष्ट्रवादीकडून वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी सुधीर देसाई यांची निवड करून एक प्रकारे मास्टर स्ट्रोक मारला होता. सुधीर देसाई यांचे तालुक्यातील गावा गावात असणारे राजकीय संबंध याचा पुरेपूर उपयोग हा त्यांच्या विजयासाठी सोपस्कर ठरला. भाजप शिवसेनेने एकजुटीचे दर्शन घडवले असते तर कदाचित या मतदारसंघावर त्यांना वर्चस्व गाजवता आले असते. पण भाजप व शिवसेनेने दिलेले उमेदवार हे एकाच भागातील व एकाच गावातील असल्यामुळे सुद्धा याचा फायदा राष्ट्रवादीचे सुधीर देसाई यांना झाला.
वाटंगी पंचायत समितीमध्ये मात्र समीर पारदे यांनी 6226 मध्ये घेऊन भाजपचे वर्चस्व दाखवून दिले. गेल्या दोन दशकापासून राजकारणात सक्रिय असलेले राष्ट्रवादीचे राजू होलम हे एक हाती निवडून येतील असा विश्वास असतानाच. मलिग्रेचे माजी सरपंच समीर पारदे हे 963 मतांनी विजयी झाले. त्यामुळे पुन्हा एकदा वाटंगी मतदारसंघावर भाजपचा वरचष्मा पाहायला मिळाला. सध्याच्या या निवडणुकीतून गावागावातून मात्र नवीन गट निर्माण झाले आहेत त्यामुळे पुढे होऊ घातलेल्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीवर याचा परिणाम होणार हे निश्चित.












