रणधुमाळी

सध्या जिल्हापरिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून महाविकास आघाडीतील नेत्यानी लढाई आधीच तलवार म्यान केल्याने महायुतीमध्येच रणकंदन पाहायला मिळत आहे. महायुतीतील भाजप शिवसेना व राष्ट्रवादीचे तुल्यबळ उमेदवार रणांगणात उतरलेले पाहायला मिळत आहे. या तिन्ही पक्षांचे आमदारांचे वर्चस्व तालुक्यावर असून तिन्ही आमदारांची कसोटी पणाला लागली आहे.सध्या प्रचार यंत्रणेचा जोर चढला आहे. उमेदवारानी तालुक्यातील हॉटेल आधीच बूक करून ठेवली आहेत दिवसभर प्रचार करायचा आणि रात्रभर चिकन मटन रक्ती मुंडी यावर ताव मारायचा असा कार्यक्रम सध्या कार्यकर्त्यांचा चालू आहे. पहाटे सात वाजल्यापासून ते रात्री दहा वाजेपर्यंत कार्यकर्ते पायाला भिंगरी बांधून संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढण्यात मग्न आहेत. विधानसभा निवडणुकीपासून शांत असलेले गावागावातील गट आता पुन्हा सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. गावागावातून गटागटाच्या जेवणावळी सुरू झाल्या असून काही हौसे-नवशे दोन्हीकडेही जेवणाचा आस्वाद घेताना पाहायला मिळतात. काही ठिकाणी तर पुढाऱ्यांनी देवांच्या शपथ घेऊनच जेवणावेळी घातल्याचे चर्चा जोरात सुरू आहे.
काहीजण संध्याकाळ झाली की गावातील बस स्टॅन्ड चे अड्डे धरूनच आशेवर बसलेले असतात. काही मतदारांनी तर मागील विधानसभेच्या आठवणी उजळायला सुरू केले असून आमदारकीच्या निवडणुकीत वाटप केलेल्या आकड्यानुसार आता चार अंकी आकडा मिळतो की तीन आकड्यावरती भागतं यावरती चर्चा रंगताना पाहायला मिळत आहे. सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अचानक अपघाती मृत्यूमुळे निवडणूक आयोगाने दोन दिवसांनी निवडणुका पुढे ढकलल्यामुळे कार्यकर्त्यांची तर चंगळ झाली पण उमेदवारांवर आर्थिक खर्चाचा बोजा वाढला असून आणखी दोन दिवस कार्यकर्त्यांना पोसण्याचे जोखीम उमेदवारावरती आले आहे.
प्रत्येक कार्यकर्ता हा आपलाच उमेदवार किती फरकाने येणार हे आत्तापासूनच गणित मांडायला सुरू केली आहे. पण प्रत्यक्षात उमेदवारांना आमदारांकडून आर्थिक रसद ही कितपत मिळणार व त्याची यंत्रणा तळागाळापर्यंत कशी पोहोचणार यावरच प्रत्येक उमेदवाराचा जय पराजय अवलंबून आहे.
महादेव कुडव शिरसंगी













