आजरा पंचायत समिति प्रशासनाकडून तक्रारीकडे दुर्लक्ष – ग्रामस्थांचा आरोप
सिरसंगी प्रतिनिधी
हंदेवाडी तालुका आजरा येथील विठ्ठल रुक्मिणी वसाहतीतील महात्मा गांधी रोजगार हमी योजना मधून मंजूर झालेल्या रस्त्यांची सुमारे 99 लाखांची कामे प्रशासन च्या निष्काळजीपणाने रखडली असून,संबंधितांवर कारवाई करून सदर कामे पावसाळ्यापूर्वी मार्गस्थ लावून ग्रामस्थांची चिखलातून चालण्याची सुटका करावी अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनातून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.जस्मिन व जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांचेकडे करण्यात आली आहे.
निवेदनात असे नमूद केले आहे की सदर वसाहतीमध्ये पावसात मोठ्या प्रमाणात चिखल होतो.लोकांना चालणे ही अशक्य होते. अशी अवस्था ग्रामपंचायतीला माहीत असूनही सदर वसाहतीतील रस्ते करण्याची टाळाटाळ केली. सदर रस्ते डिसेंबर 2025 मध्ये मंजूर होऊनही या वसाहती मध्ये रस्त्यांची नितांत आवश्यकता असूनही संबंधितांनी टाळाटाळ केली असून सदर निधीची मुदत 31 मे ला संपणार असल्याचे समजते. तरी जर निधी परत गेला तर संबंधित प्रशासन व पंचायत समितीचे संबंधित अधिकारी ,प्रशासन ,ठेकेदार यांचेवर दंडात्मक कार्यवाही करावी . असे निवेदनात नमूद करण्यात आले असून. निवेदनात पुढे म्हटले आहे की बी.डी.ओ.सुभाष सावंत यांना निवेदन देऊनही त्यांनी घटनास्थळाची कोणतीही माहिती व पाहणी केली नाही असे म्हटले आहे. तसेच सदर वसाहती मध्ये पिण्याच्या पाण्याची व वीज खांबावर वीज बल्ब बसविण्याची व्यवस्था करावी. तसेच गावातील रस्त्याचे उद्घाटन दीड वर्षापूर्वी होऊनही अद्याप रस्त्याचे काम सुरू नाही त्याचीही चौकशी व्हावी.असे म्हटले आहे.. निवेदनावर, शीतल कदम, छाया चव्हाण, आनंदा शिंदे, संभाजी जाधव, शालू कांबळे, रविंद्र शिंदे यांच्यासह ग्रामस्थांच्या सह्या आहेत.
निवेदनाच्या प्रति ,बांधकाम व आरोग्य सभापती जी. प . व म. न. रे. गा. विभाग यांना देण्यात आल्या आहेत.जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन महसूल तहसीलदार हणमंत म्हेत्रे यांनी स्वीकारले.तर जी. प.कार्यालयात कृषी अधिकारी अजित खताळ यांनी निवेदन स्वीकारले.तरी संबंधित अधिकारी यांनी पावसाळ्यापूर्वी वसाहतीतील रस्ता मार्गस्थ लावावा अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर धरू लागली आहे.













